उत्तर प्रदेशातील फैजाबादमधील सुमारे ८० वर्षांचे शरीफ चाचा अर्थात मोहम्मद शरीफ यांचा यंदाच्या पद्मश्री विजेत्यांमध्ये समावेश आहे. गेल्या २७ वर्षांत त्यांनी सुमारे साडेपाच हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. मृत व्यक्तीच्या धर्मानुसार त्या पद्धतीने त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. स्वतःच्या मुलाचा अचानक मृत्यू होऊन बेवारसासारखं मरण त्याच्या पदरी आलं, तेव्हापासून शरीफ चाचांनी हे व्रत हाती घेतलं असून, पद्मश्री मिळाल्यामुळे त्या कामाची देश पातळीवर दखल घेतली गेली आहे.
.........
माणसाने माणसासोबत माणसासारखं राहावं, एकमेकांचा मान ठेवावा, अडीअडचणीला मदतीला जावं, हे सगळं आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासून सांगितलं गेलं आहे. अनेक संत, महापुरुषांनी हेच सांगितलं आहे. आणि तसं जगण्यातच खरं सुख आणि समाधान आहे; मात्र आज आपण खूप प्रगती करूनही, पाच-पाच आकडी उत्पन्न मिळवूनदेखील म्हणावे तितके समाधानी दिसत नाही.
अशा वेळी पुन्हा एकदा तो माणुसकीचा दिवा प्रत्येक मनात पेटला, तर नक्की चित्र बदलेल, असं मला वाटतं. आपल्या मनात असा दिवा पेटवण्यासाठी भोवती अनेक माणसं स्वतःच्या आचरणातून ते सांगत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मृतदेहाशी नाते जोडून माणुसकी जपणारे ‘शरीफ चाचा.’ आज त्यांचीच कहाणी सांगतोय.
‘यूपी’मधील फैजाबादमध्ये सायकल दुरुस्तीचं दुकान चालवून त्यातून प्रपंच सावरणारे शरीफ चाचा! त्यांना काही वर्षांपूर्वी नियतीने एक मोठा फटका दिला. ‘चाचा’च्या जागी दुसरा कुणी असता तर कोलमडून पडला असता; पण ‘चाचां’नी मात्र त्यातून एक वेगळंच अनोखं असं कार्य सुरू केलं.
झालं काय, की त्यांचा अवघ्या बावीस वर्षांचा तरुण मुलगा (महंमद रईस) हा काही कामानिमित्त सुलतानपूरला गेलेला; मात्र १५ दिवस झाले तरी तो परतला नाही. शेवटी सुलतानपूर रेल्वे पोलिसांकडून निरोप आला, की एक शव (डेड बॉडी) रुळाच्या कडेला पडलं होतं. आम्ही शोध घेऊनही नीट ठावठिकाणा लागला नाही म्हणून खात्याने ‘लावारिस’ नोंद करून विल्हेवाट लावली; मात्र नंतर शर्टवरील लेबलवरून थोडाफार शोध घेतला असता तुमच्यापर्यंत तो धागा निघाला, म्हणून कळवत आहोत. ‘चाचा’ तिकडे गेले. त्यांच्यासमोर, मुलाला मारून ज्या पोत्यात टाकून दिल होतं ते पोतं आणि एक-दोन कपडे दाखवले गेले. त्यावरून ‘चाचा’ला कळलं का हा आपलाच मुलगा होता. ते सुन्न झाले.
घरी परत आले. एकच विचार सतत डोक्यात, की मी जिवंत असताना माझा मुलगा बेवारसासारखा गेला.
अन् मग त्यांनी मनाशी ठरवलं. ‘जे मला सोसावं लागलं, ते इतर कुणाला सोसावं लागू नये. कोणत्याही ‘लावारिस डेड बॉडी’ची दुःखदायक अशी विल्हेवाट लावली जाऊ नये. म्हणून ते काम यापुढे आयुष्यभर मी करीन,’
अन् त्या दिवशीपासून प्रपंच, सायकल दुकान सांभाळून ‘चाचा’ शहरात कोठेही असे लावारिस मृतदेहांचे (भिकारी असो, की घरच्यांनी गरिबीला कंटाळून दवाखान्यात भरती करून नंतर निघून गेलेले मृतप्राय रुग्ण असो, या सर्वांचे) अंत्यसंस्कार स्वतः पदरमोड करून करू लागले. आजवर त्यांनी हजारो मृतदेहांचे अंतिम संस्कार केले आहेत. हे करताना त्यांनी कधीच त्या देहाची जात पाहिली नाही. ‘सब का खून एक ही रंग का है, तो भेद किस बात का?’ असं म्हणून त्यांनी धर्म कोणताही असो त्याचे अंत्यसंस्कार त्या त्या धर्माच्या रिवाजाप्रमाणे केले. हिंदू असेल तर दहन आणि मुस्लिम असेल तर दफन!!
‘उस वख्त मुझे ऐसा लगता है, की मानो मैं अपने ही गुजरे हुए उस मेरे लडके का अंतिम संस्कार कर रहा हूँ’ असं चाचा म्हणतात. आणि शिवाय ‘चाचा’ असं म्हणतात, की ‘यही मेरी इबादत (पूजा) है, जो शायद अल्ला के साथ साथ भगवान को भी कुबुल हो जायेगी’
**
डीडी क्लास : किती व्यापक अन् विशाल हृदयाचा हा विचार आहे ना? ‘चाचा’ जे काम करतात ते काम करायला खरं तर पैसे देऊनपण अनेकदा माणसं मिळत नाहीत. हे विदारक सत्य मी एक-दोन वेळा स्वतः पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत पाहिलं आहे. शेवटी मग गल्लीतल्या मंडळाचे कार्यकर्ते अशा वेळी पुढे येतात. अशांना प्रेरणा देण्याचं कामच जणू शरीफ चाचासारखे लोक करत आहेत. जिवंतपणी माणसाची सेवा करावी, हे तर महान पुण्यकर्म आहेच; पण मरणानंतर त्या देहासोबत माणुसकीने वागून अनेक अशा बेवारसाच्या घरच्यांना नंतर तरी कधी कळलं ते सगळं, तर थोडं तरी समाधान मिळू शकतं ना? शरीफ चाचासारख्या अशा काही व्यक्तींची माहिती समोर आली, की मी निःशब्द होतो. कुठून येत असेल यांच्यामध्ये इतकी मनःशक्ती? जात-धर्मापलीकडे ‘माणूस’ हा एकच धर्म असल्याची जाणीव यांच्यात जी दिसते त्याला माझा साष्टांग दंडवत!! असे काही शरीफचाचा तुमच्या भोवती असल्यास किमान त्यांना जमेल तशी मदत केली, तर तेही तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊन येतील. हे सांगण्यासाठीच ही पोस्ट!
- धनंजय देशपांडे (डीडी)